धर्म
Trending

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सन्मान करतांना जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य
सनातन संस्थेचे पू. पृथ्वीराज हजारे यांच्या शुभहस्ते जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा भावपूर्ण सन्मान
सनातन आश्रमातील धर्मकार्याची माहिती घेतांना जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य
सनातन आश्रमातील धर्मकार्याची माहिती घेतांना जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य

फोंडा (गोवा) – कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःमधील सात्त्विकता जागृत करून संघटित होणे, ही काळाची गरज आहे. मानव जन्मातच आपले नशीब बदलण्याचे सामर्थ्य असून योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कार्य केल्यास विश्वशांतीचे ध्येय गाठता येईल, असे ओजस्वी मार्गदर्शन रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (रत्नागिरी) येथील अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी व्यक्त केले. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट दिली. या ‍वेळी केलेल्या मार्गदर्शनात त्यांनी समष्टीपर संदेश दिला.   

     ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूहाचे संपादक श्री. योगेश जलतारे यांनी त्यांना सनातन आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचीही त्यांनी भेट घेतली. सनातन संस्थेचे पू. पृथ्वीराज हजारे यांच्या शुभहस्ते जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला. या वेळी भारताचार्य पू.(प्रा.) सु.ग. शेवडे आणि सनातनच्या संत पू. (सौ.) ज्योति ढवळीकर उपस्थित होत्या.

     या वेळी मार्गदर्शन करतांना जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी सांगितले की , हिंदु धर्मीयांनी सर्व भेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. आमचे आणि प.पू. डॉ. आठवले यांचे मिशन एकच आहे, ते म्हणजे हिंदु धर्माचे रक्षण आणि उत्थान! समाजाच्या कल्याणासाठी सात्त्विक शक्तींचे एकत्रीकरण होणे, ही आजच्या काळाची सर्वांत मोठी आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प.पू. डॉ. आठवले हे अंतर्बाह्य सत्पुरुष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनचे साधक जगभरात विश्वशांतीचे असामान्य कार्य करत आहेत. हे कार्य इतर कोणत्याही संप्रदायाला सहजासहजी शक्य झालेले नाही, कारण येथे गुरुतत्त्व प्रधान मानले जाते आणि शिस्तबद्ध पद्धतीने साधना केली जाते, असे गौरवोद्गार महाराजांनी काढले.

 

    या वेळी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य पुढे म्हणाले की, कलियुगात रज आणि तम या गुणांचा प्रभाव आपोआप वाढतो; त्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नसते. हे गुण मानवी जीवनाला अधोगतीकडे नेतात. या गुणांचा प्रभाव नष्ट करून सात्त्विकता वाढवण्यासाठी समाजाने ‘साधना’ करणे अनिवार्य आहे. संतांच्या सान्निध्यातील सात्त्विक स्पंदने मानवाला आत्मचैतन्याकडे घेऊन जातात. सनातन आश्रमातील साधक ज्या प्रकारे स्वतःच्या चुका लिहतात आणि आत्मचिंतन करतात, त्या पद्धतीचा महाराजांनी विशेष गौरव केला. जर समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे दोष शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न केला, तरच एक निर्दोष आणि सुसंस्कृत समाज घडेल, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!