धर्म
Trending

पाळधी येथे अखंड हरिनाम सप्ताहात संग्राम बापू भंडारे यांचे जाहीर आवाहन: “फितुरांपासून सावधान राहा, माता-भगिनींचे रक्षण करा”

जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगांचा दाखला देत पाखंडावर कडक प्रहार

​पाळधी (ता. धरणगाव):

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने पाळधी गावात ‘अखंड हरिनाम व सहकीर्तन सप्ताह’ (वर्ष चौथे) चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी रात्री ८ ते १० या वेळेत श्रीराम नगर येथील जीपीएस स्कूल कॅम्पस, पाळधी बु॥ येथे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. धर्मभूषण संग्राम बापू भंडारे (आळंदीकर) यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. या प्रसंगी बापू भंडारे यांनी आपल्या अमोघ वाणीतून उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले.

​छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांची सांगड

​कीर्तनाचे निरूपण करताना संग्राम बापू भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे व विचारांचे प्रसंग सांगितले. तसेच अफझलखान वधाचा थरारक इतिहास मांडत त्यांनी आजच्या समाजाला “नकारात्मक प्रवृत्ती आणि फितुरांपासून सावधान राहा” असा कडक इशारा दिला.

​जगद्गुरू तुकोबारायांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी पुढील महत्त्वाच्या अभंगांचे निरूपण केले:

​”भले देऊ काशेची लंगोटी । नाथाच्या काठी माती वाहे”

​तसेच धर्माचे रक्षण आणि पाखंडाचा बिमोड करणे किती गरजेचे आहे, हे स्पष्ट करताना त्यांनी तुकोबारायांचा पुढील आक्रमक अभंग पूर्ण ताकदीने मांडला:

​”धर्माचें पाखांड खंडण । हें चि आम्हा करणें काम ॥१॥

न भिऊं घालूं आपल्या प्राणा । तुका म्हणे वचन सत्य ॥२॥”

​अपराध्यांना घटनास्थळीच ठेचले पाहिजे: कायद्याच्या भयावर भाष्य

​महाराष्ट्रात लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबद्दल बापू भंडारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “असे क्रूर कृत्य करणारे दोषी कारागृहात जाऊन मटण खातात, त्यांना तिथे व्ही.आय.पी. सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यामुळे अशा नराधमांना कायद्याचे भय उरलेले नाही. अशा कृत्य करणाऱ्यांना घटनास्थळीच ठेचून काढले पाहिजे, तरच समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल. तरुणांनो, धर्माच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. जय हिंदू!”

​पालकमंत्री गुलाबराव पाटलांना ‘घरवापसी’चे आवाहन

​कीर्तनादरम्यान त्यांनी हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांच्या ‘घरवापसी’वर विशेष भर दिला. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कारागृहातील धर्मांतर रोखून अनेकांना स्वधर्मात परत आणले, तोच वारसा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

​”स्वधर्मातून परधर्मात गेलेल्या ज्या भावंडांची परत येण्याची इच्छा असेल, त्यांच्या घरवापसीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

​बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी आणि मंत्र्यांचे अभीष्टचिंतन

​कीर्तनाच्या शेवटी संग्राम बापू भंडारे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त (अभिष्टचिंतन सोहळा) शब्दसुमनांनी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांचे सुपुत्र प्रतापराव गुलाबराव पाटील आणि विक्रमराव गुलाबराव पाटील या दोन्ही बंधूंनाही भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​या कीर्तन सोहळ्याला पाळधी परिसरातील तसेच धरणगाव तालुक्यातील हजारो भाविक, तरुण आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कीर्तनानंतर राम कृष्ण हरी नामजप करत कीर्तन कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!