धर्मलोकल न्यूज़

दिल्लीतील भारत मंडपम् येथे भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन !

दुर्मिळ शिवकालीन शस्त्रप्रदर्शन  संरक्षणतज्ञांद्वारे देशाच्या सुरक्षेवर चर्चा !

नवी दिल्ली – ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या धाडसी मोहिमांपासून ते चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनण्यापर्यंतचा प्रवास भारताने केला आहे; मात्र अलीकडेच दिल्लीतील बॉम्बस्फोट, तसेच देशांतर्गत लहान-लहान व्हॉइट कॉलर दहशतवादी गट कार्यरत करून हल्ल्याची योजना आखली जात असल्याचे समोर आले आहे. यातून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे देशविरोधी विदेशी शक्ती, डीप-स्टेट, नक्षलवाद, विघटनवादी, घुसखोरी, नॅरेटीव्ह युद्ध, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदी विविध माध्यमांतून भारताला खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी दिखाऊ धर्मनिरपेक्षतेची नव्हे, तर भारतभूमीमध्ये पुन्हा एकदा प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्षात्रतेजाची नितांत आवश्यकता आहे. देशात पुन्हा सुरक्षा, संस्कृती आणि शौर्य यांचे जागरण होण्यासाठी भारताने विश्वकल्याणकारी ‘सनातन राष्ट्र’ म्हणून उभे राहणे अत्यावश्यक आहे. हाच संदेश देशभर पोहोचवण्यासाठी ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ १३ व १४ डिसेंबर २०२५ या दिवशी नवी दिल्ली (इंद्रप्रस्थ) येथील ‘भारत मंडपम्‌’मध्ये होणार असल्याची माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली. 

          दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित पत्रकार परिदेषेत ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे अध्यक्ष व भारताचे माजी माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर, हिंदु जनजागृति समितिचे मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ती श्री. चेतन राजहंस, तसेच सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अमिता सचदेवा हे उपस्थित होते.

          सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले की, सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष, तसेच रामराज्यासम ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेसाठी कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गोव्यात पहिला ‘शंखनाद महोत्सव’ झाला. त्याला २३ देशांतील ३० हजारांहून अधिक भाविकांचे अभूतपूर्व उपस्थिती, अनेक साधूसंत, गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती लाभली व महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. त्यानंतर आता दिल्लीत होणारा हा महोत्सव राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणाचा शंखनाद करणारा असेल.

          सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी रामराज्यासमान आदर्श ‘सनातन राष्ट्र’ स्थापन करण्याचा पवित्र संकल्प केला आहे. महाभारत युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी जसे धर्मयुद्धाचा शंखनाद केला, त्याचप्रमाणे हा महोत्सव धर्मनिष्ठ समाजातील आत्मशक्ती जागृत करून धर्मसेवा, राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा शंखनाद आहे.

          दोन दिवसीय महोत्सवात ‘सनातन संस्कृती संवाद’, सांस्कृतिक-सामाजिक घडामोडी, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद-नक्षलवादाची पार्श्वभूमी, संरक्षणनीती आणि राष्ट्रबळ दृढ करण्याचे उपाय या महत्त्वाच्या विषयांवर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उद्बोधन करतील. दुसऱ्या दिवशी ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र’ या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.

          दुर्मिळ शिवकालीन शस्त्रप्रदर्शन  दिल्लीतील भव्य अशा भारत मंडपम्‌मधील एक्झिबिशन हॉल क्रमांक ‘१२’ मध्येही १३ ते १५ डिसेंबर २०२५ या तीन दिवसीय कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन’, तसेच ‘सनातन संस्कृती’, ‘राष्ट्र, कला, आध्यात्मिक वस्तू’ यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. या प्रदर्शनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे २५० हून अधिक दुर्मिळ आणि ऐतिहासिक शस्त्रे दिल्लीमध्ये प्रदर्शित होत आहेत. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पाहता येईल. पारंपरिक आणि प्राचीन युद्धकलांचे रोमांचकारी प्रात्यक्षिकेही या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असेल.

          या महोत्सवात अनेक संत-महंत, मान्यवर, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती असणार आहे. त्यात श्रीराम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज, केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय शेठ, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भारताचे माजी सरन्यायाधीश श्री. उदय लळित, संरक्षण तज्ञ श्री. संजय अग्रवाल, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य श्री. प्रियांक कानुनगो, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे अध्यक्ष व भारताचे माजी माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर, मेहंदीपुर बालाजी मंदिराचे प.पू. डॉ. नरेशपुरीजी महाराज, तसेच सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. तसेच काशी-मथुरा मुक्तीसाठी लढणारे अधिवक्ता विष्णू शंकर जैन, सुदर्शन न्यूजचे प्रधान संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांची उपस्थित असणार आहे. संतांचे आध्यात्मिक बळ आणि या मान्यवरांचे सामाजिक अन् राष्ट्रीय कार्य, यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हा महोत्सव असेल.

          या महोत्सवाची माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच सहभागी होण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी, तसेच कार्यक्रमस्थळी येतांना सोबत शासकीय ओळखपत्र आणावे, असे आवाहनही सनातन संस्थेकडून करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!