जळगाव जिल्ह्यात पीएम आवास योजनेबाबतची “जागा नसल्याची” अफवा खोटी; प्रशासनाचा स्पष्ट खुलासा

जळगाव | प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – टप्पा २ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात घरकुलांच्या बांधकामाला मोठा वेग आला असून अनेक लाभार्थ्यांची घरे पूर्णत्वाच्या दिशेने पोहोचत आहेत. मात्र अलीकडे “जागा उपलब्ध नसल्यास घरकुल मंजूर होणार नाही” अशी अफवा जिल्ह्यात वेगाने फैलावत असल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्हा प्रशासनाने ही अफवा पूर्णपणे फेटाळून लावत सांगितले की पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर नियमित सुरू आहे. कोणत्याही लाभार्थ्याला “जागा नसल्यामुळे मंजुरी मिळणार नाही” असे सांगणे चुकीचे असून अशा प्रकारची माहिती देणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
जागा उपलब्धता किंवा घरकुल मंजुरी प्रक्रियेबाबत कोठेही अडथळा आल्यास अथवा कोणाकडूनही चुकीची माहिती दिली गेल्यास तात्काळ जिल्हा परिषद जळगाव किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल यांनी विशेष व्हिडिओद्वारे नागरिकांना योग्य माहिती घेण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि योजना सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट केले.
प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणारी महत्त्वाची योजना असून तिची अंमलबजावणी जळगावमध्ये वेगाने सुरू आहे.




