धरणगाव : गुप ग्रामपंचायत अंतर्गत वंजारी-खपाट गावात सुरू असलेला अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसाठी गावकऱ्यांनी मा. पोलीस निरीक्षक, धरणगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन सादर केले.
गावातील नागरिक व महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अवैध दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून अनेक तरुण तसेच अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. याचा त्यांच्या आरोग्यावर आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत आहे. काही घटनांमध्ये जीवितहानी झाल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक संकट ओढवले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गावातील हातभट्टी दारूचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी वंजारी गावाचे पोलीस पाटील दिलीप साळवे, खपाट गावाचे पोलीस पाटील गरबळ अहीरे, वंजारी गावाचे सरपंच शंकर पाटील, माजी सरपंच डॉ. दीपक पाटील, तुषार चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर काकडे, राजेश महाजन, युवासेना अध्यक्ष सुभाष बोरसे, गोपाल महाजन तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते.
“दारूमुक्त गाव, सुरक्षित गाव” या संकल्पनेतून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.




