पाळधी (ता. धरणगाव) येथे भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ : ग्रामस्थ भयभीत
पाळधी (ता. धरणगाव) : गावातील भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वयोवृद्ध नागरिक, शाळकरी मुले, रात्रपाळीत जाणारे कामगार तसेच वाहन चालक यांना या कुत्र्यांच्या उच्छादामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

गावातील मेन रस्ता, शाळेजवळील परिसर तसेच बस स्टॅन्ड भागात या कुत्र्यांचा वावर अधिक असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. विशेष म्हणजे, दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांचा हे कुत्रे पाठलाग करीत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी कुत्र्यांच्या हल्यामुळे नागरिक जखमी झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
या परिस्थितीमुळे शाळकरी मुलांना शाळेत जाणे धोक्याचे झाले आहे, तर वयोवृद्ध नागरिक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.




