महागाव (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात असलेल्या जरंडी तांडा येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज महागाव (जि. यवतमाळ) येथील सकल बंजारा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
घटनेचे गांभीर्य आणि जनक्षोभ
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे बंजारा समाजात प्रचंड संतापाची लाट आहे. एका ८० वर्षांच्या वृद्धेवर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून तो संपूर्ण समाजाच्या नैतिकतेवर झालेला हल्ला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, “अशा नीच प्रवृत्तीच्या आणि राक्षसी मनोवृत्तीच्या गुन्हेगारांना समाजात स्थान नाही.”
निवेदनातील प्रमुख मागण्या:
या घटनेतील नराधमावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
राज्य सरकारने या घटनेची विशेष दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी गुन्हेगारांवर कठोर जरब बसवावी.
यावेळी महागाव तहसील कार्यालयात निवेदन देतेवेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये हिरासिंग चव्हाण, सुरज सुधाकरराव पवार, डॉ. पंजाबराव राठोड, नितीनकुमार राठोड, जगदीश चव्हाण, पी. बी. नाईक यांच्यासह इतर मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जरंडी तांडा येथील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आता महागावच्या या निवेदनानंतर सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Back to top button
error: Content is protected !!