टॉप न्यूज़महाराष्ट्र

तीन महिने पाठपुरावा करूनही ‘एस्.टी.’ चे ७२% संपर्क क्रमांक ‘डेड’ !

आता आश्वासन नको; संपर्क यंत्रणा सुरू करा - सुराज्य अभियान !

जळगाव येथे पत्रकार परिषद !
     जळगाव – प्रवाशांना माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर दिलेले आगार आणि बसस्थानकांचे अधिकृत संपर्क क्रमांक मोठ्या प्रमाणात बंद किंवा त्यावरून प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या या गंभीर समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १३ मार्च २०२६ रोजी पद्मालय रेस्ट हाऊस, जळगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला सुराज्य अभियानाचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. दुर्गाप्रसाद पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा हिंदू संघटक श्री. यशवंत चौधरी यांनी संबोधित केले. यावेळी ‘सुराज्य अभियाना’ ने एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणला. या बाबत आज विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांना पुन्हा एकदा तक्रार वजा निवेदन देऊन तातडीने प्रवाशांची अडचण सोडवण्याची मागणी करण्यात आली.

परिषदेला संबोधित करताना (डावीकडून) यशवंत चौधरी, दुर्गाप्रसाद पाटील
राज्याचे परिवहन मंत्री यांना सुराज्य अभियानाच्या वतीने दिलेले निवेदन
एवढा पाठपुरावा करून ही प्रवाशांच्या अडचणी बाबत प्रशासन उदासीन का ?
राज्य परिवहन मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेले बहुतांश अधिकृत संपर्क क्रमांक वारंवार बंद असतात किंवा संपर्क केल्यास प्रतिसाद मिळाले नाही. ‘सुराज्य अभियाना’ ने याविषयी प्रत्यक्ष तपासणी करून सातत्याने पाठपुरावा केला. मात्र एवढा पाठपुरावा करूनही आगार / स्थानकस्तरावर परिस्थिती जैसे थे आहे.
– दिनांक १६.१२.२०२५ रोजी माननीय परिवहन मंत्री, अध्यक्ष, राज्य परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्त यांना ईमेल ने पहिले पत्र दिले.
– त्यावर दिनांक १७.१२.२०२५ रोजी महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी ३१ विभाग नियंत्रकांना ईमेलद्वारे आदेश दिले.
– डिसेंबर २०२५ मध्ये राज्यातील विविध बस स्थानक / आगार व्यवस्थापक / विभाग नियंत्रक यांना या विषयी प्रत्यक्ष निवेदन दिले.
– दिनांक २०.०२.२०२६ रोजी सुराज्य अभियानाने स्मरणपत्रे ईमेल केल, तसेच केलेली कार्यवाही खात्यास आणि अर्जदारास कळविण्यात यावी, असे सांगितले.
संपर्क क्रमांक तपासणीची धक्कादायक आकडेवारी !
‘सुराज्य अभियाना’ च्या प्रत्यक्ष पडताळणीतून समोर आलेली आकडेवारी प्रवाशांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
  • बस स्थानक + आगार असे एकूण तपासलेली संपर्क क्रमांक संख्या: 413
  • सुरू असलेले / प्रतिसाद मिळाला अशी क्रमांक संख्या: 117 (केवळ 28%)
  • बंद / प्रतिसाद न मिळणारी क्रमांक संख्या: 296 (72%)
आपल्या जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर क्षेत्रातील या बस स्थानका /आगारा वरील संपर्क क्रमांकांची हीच दयनीय परिस्थिती आहे.
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानां’ तर्गत केवळ रंगरंगोटी करून किंवा पारितोषिके देऊन चालणार नाही, तर प्रवाशांना मिळणारी ‘प्रत्यक्ष सेवा’ अधिक महत्त्वाची आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही या अडचणी विषयी सातत्याने पाठपुरावा करत आहोत, मात्र प्रशासकीय अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रवाशांची गैरसोय आजही जैसे थे ! मुळात, बसस्थानकाच्या दूरध्वनी व संपर्क यंत्रणेसाठी दरमहा ठराविक निधी (बजेट) मंजूर असतो, मग हा पैसा जातो कुठे? जर प्रवाशांना ही सुविधाच मिळत नसेल, तर या संदर्भातील वर्षानुवर्षे दिलेली रक्कम संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून व्याजसहित का वसूल केला जाऊ नये? असा थेट प्रश्न ‘सुराज्य अभियाना’चे श्री. दुर्गाप्रसाद पाटील यांनी उपस्थित केला आहे.
त्वरित प्रशासकीय जबाबदारी निश्चित करा !
बंद लँडलाईनला सक्षम पर्याय म्हणून प्रत्येक बस स्थानक आणि डेपोसाठी अधिकृत भ्रमणभाष क्रमांक त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. त्यांची माहिती त्वरित संकेतस्थळावर अध्ययावत करण्यात यावी. तसेच, जाणीवपूर्वक फोन न उचलणाऱ्या किंवा अधिकृत क्रमांक निष्क्रिय ठेवणाऱ्या जबाबदार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर असे करणे ही ‘सेवा-त्रुटी’ मानून कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. याशिवाय, बस स्थानकाचे दर १५ दिवसांनी होणाऱ्या ‘डीप क्लीनिंग इन्स्पेक्शन’ मध्ये केवळ स्वच्छतेचीच नाही, तर ‘संपर्क प्रणाली’च्या स्थितीची तपासणी करणे अनिवार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. या विषयाची गंभीरता लक्षात घेता, विभाग नियंत्रकांच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांकडे हे तक्रार वजा निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!