
पाळधी प्रतिनिधी | सनातन सारथी न्यूज
धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास मोबाईलवर रील बनवताना रेल्वेखाली चिरडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
मयत तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (वय १८) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय १८) अशी असून, दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर, प्लॉट भाग (रेल्वे गेटजवळ) येथील रहिवासी असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मित्र पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ मोबाईल ॲपसाठी रील तयार करत होते. त्याच वेळी धरणगावकडून जळगावकडे जाणारी अहमदाबाद–हावडा एक्स्प्रेस धावती येत असल्याचे त्यांना लक्षात आले नाही. क्षणातच गाडीने दोघांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा व पुढील तपास सुरू आहे.
या घटनेने पाळधी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मोबाईलवरील लोकप्रियतेच्या मोहात अनेक तरुण जीव धोक्यात घालत असल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे ‘धोकादायक रील्स’ बनवण्याच्या प्रवृत्तीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




