क्रूरकर्मा टीपू सुलतान’ ची जयंती शाळेत साजरी करणे हा ‘राष्ट्रद्रोह’ !
संबंधित शिक्षण अधिकारी, शिक्षक आणि आयोजकांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - हिंदु जनजागृती समितीची मागणी.

बीड – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे ‘औरंगजेबाच्या अवलादींना सोडणार नाही’ असा कडक इशारा दिला असतानाही, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘क्रूरकर्मा टीपू सुलतान’ याची जयंती साजरी करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय परिपत्रकात कोणताही उल्लेख नसताना, एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण करणे हा केवळ नियमांचा भंग नाही, तर हिंदुच्या भावना दुखावून राज्यातील शांतता बिघडवण्याचा अक्षम्य प्रयत्न आहे. या राष्ट्रद्रोही कृत्यासाठी संबंधित शिक्षक, आयोजक आणि निष्काळजी शिक्षण अधिकाऱ्यांवर तातडीने ‘गुन्हा दाखल’ करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
टीपू सुलतान हा कोणताही आदर्श राजा नसून, त्याने सक्तीचे हिंदुचे धर्मपरिवर्तन, मंदिरांचा विध्वंस आणि हजारो निष्पाप हिंदुच्या हत्यांसारखी क्रूरकृत्ये केली आहेत. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपत असताना, शासकीय यंत्रणेचा भाग असलेल्या शाळेत अशा क्रूरकर्मा व्यक्तीचे उदात्तीकरण करणे म्हणजे पुढील पिढीला चुकीचा इतिहास शिकवून राष्ट्रविरोधी प्रवृत्तींना खतपाणी घालण्यासारखे आहे. फडणवीस यांच्या स्पष्ट इशाऱ्यानंतरही हा प्रकार घडणे, हे प्रशासकीय निष्काळजीपणामुळे झाले की, यामागे हिंदुविरोधी शक्तींकडून झालेले षडयंत्र आहे, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.
या गंभीर आणि राष्ट्रद्रोही कृत्यासाठी हिंदु जनजागृती समितीची स्पष्ट मागणी आहे की, हा कार्यक्रम आयोजित करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व निष्काळजी शिक्षण अधिकारी यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तातडीने गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित शिक्षकांचे त्वरित निलंबन करावे. जर या प्रकरणातील सूत्रधारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही, तर हिंदु जनजागृती समिती तीव्र जनआंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात येत आहे.




