
लेखक: सूरज सुधाकरराव पवार
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ‘नाईक घराणे’ हे नाव केवळ सत्तेचे केंद्र म्हणून नाही, तर समाजपरिवर्तनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक आणि जलसंधारणाचे जनक, मुंबईतील गुन्हेगारी मोडीत काढणारे कणखर व्यक्तिमत्व स्व. सुधाकररावजी नाईक यांचा वारसा आज नामदार इंद्रनील मनोहरराव नाईक अत्यंत समर्थपणे पुढे नेत आहेत.
वारसा कर्तृत्वाचा, ध्यास विकासाचा
इंद्रनील भाऊ हे महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री मनोहरराव नाईक यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्याकडे पाहताना “सादगी आणि उच्च विचारसरणी” यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. पुसद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास डोळ्यासमोर ठेवला आहे.
स्व. सुधाकरराव नाईक म्हणायचे, “गोरगरिबांना किमान चटणी-मीठ आणि भाकरी सन्मानाने मिळू दे.” हाच विचार उराशी बाळगून इंद्रनील भाऊ आज काम करत आहेत.
लोकसंपर्क आणि कार्यपद्धती.
इंद्रनील नाईक यांच्या कार्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- जनता दरबार: पुसद येथील ‘नाईक बंगला’ येथे दर आठवड्याला भरणारा जनता दरबार हा लोकशाहीचा एक जिवंत अनुभव असतो. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची समस्या ते आपुलकीने ऐकून घेतात आणि त्यावर त्वरित मार्ग काढतात.
- सर्वसमावेशक विकास: ते केवळ बंजारा समाजाचे नेते नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या (गोर-गरीब, शेतकरी, तरुण) वेदना जाणणारे संवेदनशील नेते आहेत.
- अभ्यासू वृत्ती: विधिमंडळात असो वा प्रशासकीय कामात, इंद्रनील भाऊंचा प्रत्येक निर्णय हा अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टीचा असतो.
भविष्यातील ‘आशास्थान’
आज यवतमाळ जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला अशा निगर्वी आणि कामाप्रती समर्पित असलेल्या नेत्याची गरज आहे. नाईक घराण्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेले योगदान पाहता, इंद्रनील भाऊंची आगामी काळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागावी, अशी जनभावना जनमानसात उमटत आहे.
”केवळ मंत्रिपदच नव्हे, तर भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची (मुख्यमंत्री पद) क्षमता त्यांच्यात आहे,” अशी प्रार्थना तमाम कार्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून केली जात आहे.
श्री. सुरज पवार


