जळगाव शहरात आजपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

जळगाव (प्रतिनिधी) – दिवाळीनंतर शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठा मोकळ्या ठेवण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आजपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे.
शनिवारी शहरातील आठवडे भंगार बाजार परिसरात अतिक्रमण हटवण्यात आले असून, सोमवारपासून या मोहिमेला अधिक गती मिळणार आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आवाहन मनपामार्फत करण्यात आले असून, तसे न केल्यास थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या मोहिमेत सुभाष चौक, फुले मार्केट, गांधी मार्केट, नेहरू चौक, महाबळ, अजिंठा चौफुली यांसारख्या वर्दळीच्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली अतिक्रमणेही हटवली जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी अतिक्रमणविरहित मोहीम सातत्याने राबवली जाणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून मनपाला सहकार्य करावे.”
या मोहिमेमुळे शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये हलचल निर्माण झाली असून, अनेकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे.




