श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे वहनोत्सवासाठी बैलजोडी लिलाव संपन्न.

धरणगाव : येथील श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्या वतीने रथोत्सव व वहनाला बैलजोडी लावण्यासंदर्भात आयोजित लिलावाचा कार्यक्रम श्री बालाजी मंदिर चौकात मोठ्या चुरशित, चढाओढीने व खेळीमेळीच्या उत्साहात आणि पारदर्शक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रशांत वाणी यांनी केले. सुमारे ५ हजार भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी आर पाटील होते. प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तद्नंतर श्री. बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. पाटील यांनी “श्री मंदिर जीर्णोध्दार व सभागृह बांधकामाचा आढावा” सादर केला. यावेळी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असणारे धरणगाव पो.स्टे.चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी आर पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्याध्यक्ष जीवनसिंह बयस, सचिव प्रशांत वाणी, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे, ॲड. संजय महाजन आदींनी केला. यानंतर सालाबाद प्रमाणे भानुदास विसावे यांनी आपल्या बहारदार शैलीत लिलाव (बोली) प्रक्रियेला सुरुवात केली, त्यांना ॲड. संजय महाजन, किरण अग्नीहोत्री यांनी सहकार्य केले.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही अत्यंत चुरशीत होणाऱ्या लिलावात मंडळाचे अध्यक्ष व विश्वस्त, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोली प्रक्रियेत ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. शेवटी मंडळाचे अध्यक्ष प्रा. पाटील यांनी सांगितले की, शेकडो वर्षांची रथ, पालखी, वहनोत्सवाची परंपरा यंदाही सोमवार दि.२२ सप्टें, ध्वजावहन पासून ते सोमवार दि.६ ऑक्टो. पांडवसभा वहनपर्यंत तब्बल १५ दिवस आनंदी वातावरणात निघणाऱ्या आपल्या गावाचा उत्सवाला प्रारंभ होत आहे म्हणून सर्व गावकऱ्यांनी भाग घ्यावा. सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी लिलाव पारदर्शक पद्धतीने पार पडला असून, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग ही मंडळाची खरी ताकद आहे. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण वाणी यांनी केले.




