महाराष्ट्र

बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रक्रियेत पत्रकारांच्या सहकार्याची गरज -ना.अजित दादा पवार 

जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने भव्य स्वागत समारंभ

 

मला काम करायला आवडतं, दिखावूपणा आपल्या स्वभावात नाही, सत्ताही लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आहे. त्यामुळे माझ्या परीने मी बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रमाणिक प्रयत्न करणार यासाठी नागरिकांबरोबर पत्रकारांचे सहकार्य आवश्यक आहे. तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे,जिल्हा स्टेडियमची सुधारणणे बरोबरच, विमानतळचाही विषय गतीने पूर्ण होईल.येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांनी सांगितले.

बीड येथे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी निलकमल सभागृहात बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. आ.प्रकाश दादा सोळंके, आ.विजयसिंह पंडित, आ.विक्रम काळे, सचिव डॉ राजेश देशमुख जिलाधिकारी विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी जिथीन रहमान,जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर चव्हाण, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे, डॉ योगेश क्षीरसागर,बीड शहराध्यक्ष अमर नाना नाईकवाडे यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष मानूरकर यांच्या हस्ते ना.अजित दादा पवार यांचा शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संतोष मानूरकर यांनी अजित दादांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.बीड शहराच्या जायकवाडी बॅक वॉटर योजनेला मान्यता देण्याचे काम अजित दादांच्या नेतृत्वाखाली झाले होते आणि आज बीडचे पालकमंत्री म्हणून विकासाच्या बाबतीत बीड जिल्हा सर्वांगिण प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी बोलतांना पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा आलेख मांडला. हा जिल्हा पुरोगामी विचारांचा असून शरद पवार यांच्या नंतर अजित दादा पवार यांना या जिल्ह्याने साथ दिली. या पुर्वी विलासराव देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद भुषवले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. तोच योग अजित दादा पवार यांच्या बाबतीत घडून यावा अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली. गतवर्षी दिक्षाभूमी ते मंत्रालयापर्यंत निघालेल्या पत्रकारांच्या संवाद यात्रेने राज्यभरात पत्रकारांची अभुतपुर्व एकजुट झाली असून त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पुढाकार घ्यावा. राज्य सरकारने घोषणा केलेली पत्रकार आणि विक्रेत्यांसाठी चे महामंडळ कारवानीत करून भरघोस निधी द्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली.

या कार्यक्रमात बोलतांना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी गेल्या दोन दिवसात जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत घेण्यात आलेले निर्णय तसेच बैठकांची माहिती दिली. बीड जिल्हा विकासाच्या बाबतीत गतीमान करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनात पारदर्शकता येण्यासाठी चांगल्या अधिकार्‍यांची नियुक्ती आपण केली आहे.नवीन प्रशासकिय इमारती दर्जेदार पध्दतीने व्हाव्यात यासाठी बांधकाम विभागाचे तज्ञ अधिकारी काम पहात आहेत. बीड शहरातील विद्युत पोल वरील तारांचे जाळे कमी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे शहराचे सौंदर्य आणखी वाढेल. या सर्व गोष्टी करताना काही कठोर निर्णय सुध्दा आम्हाला घ्यावे लागतील. त्यासाठी नागरिकांनी आणि पत्रकारांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बीड जिल्हा पत्रकार संघाने केलेल्या सत्काराबद्दल समाधान व्यक्त करताना अजित दादा म्हणाले की, काम करत राहणे हा आमचा पिंड आहे. केलेल्या कामाचे प्रदर्शन न करता ही आपली जबाबदारी आहे असे आम्ही समजतो.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकनेताचे संपादक बालाजी तोंडे यांनी परिश्रम घेतले.

चौकट…

पत्रकार सन्मान योजनेत 20 हजार रुपये पर्यंत वाढ

कै.बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचे मानधन 20 हजार रु.पर्यंत वाढवण्यात आले आहे. त्याबद्दल राज्याचे अर्थमंत्री म्हणून ना.अजित दादा पवार यांचा पत्रकार संघाच्या  वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

चौकट…

साहित्यीक,कलावंतांची उपस्थिती 

बीड जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या अजित दादांच्या स्वागत समारंभाला संगित क्षेत्रातील जेष्ठ गायक भरत अण्णा लोळगे, अनिल हंप्रस,सतीश सुलाखे, प्रकाश मानूरकर तसेच साहित्य क्षेत्रातील डॉ.विद्यासागर पाटांगणकर,प्राचार्य सविता शेटे, नाट्य क्षेत्रातील डॉ.सुधीर निकम,डॉ.संजय पाटील देवळाणकर आदि उपस्थित होते. या सर्व साहित्यीक व कलावंतांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार केला.

चौकट….

महिला पत्रकारांचे रक्षाबंधन आणि दादांना दिले विमान 

पत्रकार संघाच्या कार्यक्रमात महिला पत्रकारांनी अजित दादांना रक्षाबंधना निमित्त राखी बांधली. तसेच बीडमध्ये विमानतळ मंजुर केल्याबद्दल संपादक वैभव स्वामी यांनी दादांना विमानाची प्रतिकृती भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!